Pune City News:- कोरोना विषाणू चा संसर्ग रोखण्यासाठी टाळेबंदीची मुदत तीन मेपर्यंत वाढवली असून रेल्वे, मेट्रो, सार्वजनिक वाहतूक, सण, उत्सव, जाहीर केल्याप्रमाणे अनेक व्यवहार यापुढेही बंद राहणार आहेत.
राज्यात टाळेबंदीचे काटेकोर पालन यापुढेही सुरू राहील, तसेच नागरिकांच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण व्हाव्यात, जनतेला आरोग्य सुविधा मिळाव्यात, शेतीची, मशागतीची कामे वेळेवर सुरू व्हावीत, अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी कोरोनासंदर्भातील मार्गदर्शक नियमावली व आदेशांचे काटेकोर पालन करण्याच्या अटींवरच काही बाबींना मर्यादित स्वरुपात परवानगी दिली आहे. सोमवारी, 20 एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.
देशात जाहीर टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने काल मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. नागरिकांनी त्याचं काटेकोर पालन करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.मार्गदर्शक नियमावलीनुसार ग्रामीण भागातील उद्योग, निवडक व्यवसाय, व्यापारी आस्थापनांना कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या अटींवर परवानगी दिली जाणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
राज्यात टाळेबंदीची मुदत वाढवली असली तरी नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा यापुढेही नियमित सुरू राहील, त्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे.नागरिकांना, कोरोना प्रसार रोखण्यासाठी घरातच थांबावे घराबाहेर पडू नये, सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहनही केले आहे.

