मुळशी धरणग्रस्तांना जगण्याच्या सुविधा घर बांधकाम, दुरुस्ती नाकारत मरणानंतर मात्र जाळण्यासाठी स्मशानभुमी बांधून धरणाग्रस्तांच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या टाटा कंपनीच्या प्रवृत्तीचा धरण ग्रस्तांच्या वतीने निषेध करण्यात आला. बार्पे खुर्द (ता.मुळशी) येथे टाटा कंपनीच्या पुतळयाचे दहन कंपनीने बांधुन दिलेल्या स्मशानभुमीतच करण्यात आले.
ब्रिटीश राजवटीत मुंबईत भांडवलदारांना वीज पुरवठा करण्यासाठी टाटांनी मुळशीत खाजगी धरण बांधले. सक्तीने जमिनी घेण्यात आल्या. ५२ गावे, हजारो धरणग्रस्त झाले. मुळशी धरण बांधून सुमारे १०० वर्षे झाली. चार-पाच पिढया संपल्या पण धरणग्रस्तांचा संघर्ष काही संपला नाही. पुनर्वसन, नागरी सुविधा आणि रोजगारासाठी धरणग्रस्तांचा संघर्ष सुरुच आहे. गावठाण बुडीत झाल्यानंतर मुळ गावां शेजारीच तर कुठे आपल्याच पण टाटांनी संपादित केलेल्या जमिनींवर जागांवर लोक राहु लागली. काळ लोटला धरणग्रस्तांचे कुटूंब वाढले. नवीन पिढया आल्या. घर दुरुस्तीला टाटा कंपनीने मज्जाव सुरु केला. नवीन बांधकाम होऊच देत नाहीत. वादळात पडझड झालेल्या घराचीही हीच अवस्था. दुरुस्ती करावी तर कंपनीची कायदेशीर कारवाईचा बडगा. अशा जात्यात धरणग्रस्त अडकून
पडले आहेत.
यावेळी स्थानिक टाटा धरणग्रस्त संघ मुळशीचे अध्यक्ष संतोष कदम, सचिव एकनाथ दिघे, भांबर्डेचे सरपंच श्रीराम वायकर, माजी उपसरपंच संजय गोरे, माजी सरपंच गोविंद सरुसे, ग्रामपंचायत सदस्य मारुती कुडले, अनिल मापारे, सुनंदा कुंभार, दत्ता दिघे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

