Pune City News :- राज्यातील काही भागांत पुरेशी काळजी घेऊन, लॉकडाऊनबाबतच्या अटी व शर्तींच्या अधीन राहून 20 एप्रिलनंतर औद्योगिक, व्यावसायीक उपक्रम सुरू केले जाणार आहेत. अर्थव्यवस्थेचे चक्र हळूहळू का होईना फिरत राहण्याच्या दृष्टीने सुधारित मार्गदर्शक आदेश जारी केल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
केंद्राच्या दिशानिर्देशानुसार 20 एप्रिलनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या व हॉटस्पॉटमध्ये नसलेल्या भागांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. लॉकडाऊनसंदर्भात राज्य शासनाने नवी सर्वसमावेशक अधिसूचना जारी केली आहे.कोरोना विषाणूचा मुकाबला करणे हे लॉकडाऊनचे मूळ उद्दिष्ट्य ठेऊन कंटेनमेंट क्षेत्र घोषित केलेली ठिकाणे वगळून इतर स्थानिक प्रशासनाच्या अधिकारात हे सुधारित आदेश लागू राहतील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा, शेती, फळबागा व शेतीपूरक उद्योग, नारळ, काजू आणि मसाला बागांमधील कामे, कुक्कुट पालन, बँकांच्या शाखा, एटीएम, ई-कॉमर्स कंपन्या सुरू करण्यास परवानगी दिली आहे. अतिरिक्त औद्योगिक घटकांसह शेतीविषयक बाबी, बांधकाम क्षेत्र यांना अधिक सूट देण्यावर भर दिला आहे.

