पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता पुन्हा जनता कर्फ्यु लागू करा, अशा स्पष्ट सूचनाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या आहेत.
मात्र या संचार बंदीचा व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याचे आदेशही पवार यांनी दिले आहेत.
पुण्यातील कोरोना स्थितिबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला सर्व प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी जनता संचारबंदी राबवण्यात येत आहे. त्यानंतर पवार यांनी सांगितले की, गरज असल्यास पुण्यातही जनता संचारबंदी लागू करा. मात्र, हे करताना नागरिकांना त्रास आणि व्यापाऱ्यांचे नुकसान होणार नाही. याबाबत खबरदारी घेण्यात यावी.’
तसेच सीओईपी मैदानावर उभारण्यात आलेल्या मोठय़ा करोना रुग्णालयाबाबत सातत्याने तक्रारी येत आहेत. तसेच ऑक्सिजनअभावी रुग्णांचे हाल होत आहेत. याबाबत बैठकीमध्ये पवार यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.
पुण्यातील कोरोना आटोक्यात का येत नाही. यावर अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले. जर कोरोना आटोक्यात आला नाही तर यापुढे अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, अधिकाऱ्यांवर थेट कारवाई करण्यात कारवाई करण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

