कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम साजरा केला जातो. यावर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव विचारात घेऊन हा कार्यक्रम प्रतिकात्मक स्वरूपात शांततेने, संयमाने साजरा करुया, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भिमा येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाची नियोजन आढावा बैठक आज जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाजवळ घेण्यात आली.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, विवेक पाटील, उप विभागीय अधिकारी सचिन बारावकर, तहसीलदार सुनील कोळी, लैला शेख तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
डॉ.देशमुख म्हणाले, आपल्या राज्यासह देश आणि जग कोरोना विरुद्ध लढत आहे. कोरोना विषाणूवर अद्यापपर्यंत लस आलेली नाही. तसेच कोरोना विषाणूची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी कार्यक्रमास गर्दी करु नये.
अशा परिस्थितीत योग्य पध्दतीने अभिवादन कार्यक्रम साजरा करत असतांना आपल्या सर्वांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी प्रशासनावर आहे. हा कार्यक्रम शांततेने आणि सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी केले.

