भारत ही संतांची भूमी असून प्रत्येक भागात संतांचे अस्तित्व आढळून येते. संतांनी समाज प्रबोधनाचे कार्य करण्यासोबतच देश जोडण्याचेही कार्य केले. त्यामधील संत नामदेव एक आहेत, असे मनोगत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.
सुषमा नहार यांनी संपादित केलेल्या ‘गुरु ग्रंथसाहिब मधील संत नामदेव’ या पुस्तकाच्या विशेष आवृत्तीचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात झाले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संत नामदेव अध्यासन आणि सरहद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संत नामदेव यांच्या ७५० व्या जयंती वर्षात देशभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा शुभारंभही यावेळी करण्यात आला.
संत नामदेव यांचे स्मरण करतांना साहित्यिकांनी नवीन पिढीला संतांविषयी माहिती करुन देण्यासाठी जास्तीत जास्त साहित्य लेखन केले पाहिजे, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.

