Pune City News:-कोरोना विषाणू प्रादुर्भाव विरोधात यशस्वी लढा देणाऱ्या पुणे महापालिकेस भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयाच्या वतीने अर्थात भारतीय सैन्य दलाच्या वतीने आज सन्मानपूर्वक मानवंदना देण्यात आली. पुणे मनपा अधिकारी,कर्मचारी ,डॉक्टर्स,आरोग्यसेवक,अशा विविध पातळीवर लढा देणाऱ्या सर्वांचा सन्मान व मानवंदना देण्याचा सोहळा मनपाच्या प्रांगणातील महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ संपन्न झाला. कार्यक्रमप्रसंगी प्रथमतः कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे मृत झालेल्या व्यक्तींना उपस्थितांनी श्रद्धांजली अर्पण केली. कोरोना विषाणू विरोधात लढणाऱ्या कर्मचाऱ्यांना भारतीय सैन्यदल मानवंदना देत असल्याचे चित्र स्वरूप याप्रसंगी मा.महापौर मुरलीधर मोहोळ व मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांना सन्मानार्थ प्रदान करण्यात आले. भारतीय सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी आणलेला केक यावेळी सफाई कर्मचारी व डॉ,संजीव वावरे यांच्या हस्ते केक कापून सैन्य दलाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या व उपस्थितांना मिठाई वाटप केले.

मा.महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मा,ब्रिगेडियर कुलजीतसिंग यांना मनपा कॉफी टेबल बुक व मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनीही पुस्तक भेट दिले. मा.रुबल अगरवाल,अति.मनपा आयुक्त यांनी मा,ब्रिगेडियर कुलजीतसिंग यांना भारतीय राष्ट्रध्वज प्रदान केला.याप्रसंगी मार्गदर्शन करताना सब एरिया पुणे चे चीफ स्टेशन कमांडर,ब्रिगेडियर कुलजीतसिंग यांनी सांगितले कि, कोरोना विषाणू प्रादुर्भाव विरोधात देण्यात येत असलेला लढा अत्यंत महत्वपूर्ण आहे,या लढ्यात योगदान देणारे योध्ये,शासन यंत्रणा,स्थानिक स्वराज्य संस्थातील सफाई कर्मचारी,डॉक्टर्स,आरोग्य कर्मचारी,अधिकारी,पोलिस कर्मचारी यांचा लढा अतुलनीय आहे,या लढ्यातील योद्ध्यांचे मनोबल उंचावण्याचा दृष्टीने त्यांचा सन्मान करणे,मानवंदना देणे आवश्यक आहे. या लढ्यात मनपाने सर्व स्तरावर प्रशंसनिय काम केलेले आहे त्यामुळे मनपाचे आम्ही कौतुक करीत आहोत. या लढ्यात भारतीय सैन्य दल आपल्या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले,लवकरच या लढ्यात आपल्याला यश मिळेल,या लढ्यातील मनपाच्या कार्यकर्तुत्ववाला भारतीय रक्षा मंत्रालयाच्या वतीने आम्ही सलामी देत असल्याचे त्यांनी सांगितले.

मा. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मनोगत व्यक्त करताना ,भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयाच्या वतीने केलेला सन्मान व दिलेली मानवंदना मनोबल उंचावण्यासारखी असल्याचे सांगितले तसेच या कार्यक्रमा करिता स्वतः ब्रिगेडियर कुलजीतसिंग यांनी उपस्थित राहून मनोबल वाढविले यासाठी, मनपाचे वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. मा,मनपा आयुक्त यांनी मनोगत व्यक्त करताना या लढ्यातील योद्ध्यांचे मनोबल वाढविण्याच्या दृष्टीने भारत सरकारच्या रक्षा मंत्रालयाने या माध्यमातून केलेला सन्मान नक्कीच मनोबल वाढविणारा असल्याचे सांगितले.
कार्यक्रम प्रसंगी अतिरिक्त मनपा आयुक्त रुबल अगरवाल यांनी प्रास्ताविक केले व सूत्रसंचालन सुरक्षा अधिकारी नितीन केंजळे यांनी केले व आभार प्रदर्शन अतिरिक्त मनपा आयुक्त शांतानु गोयल यांनी केले.कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी तसेच मनपा कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते,

