राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत अभिष्टचिंतन कार्यक्रमाचं आयोजन केले होते. यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
पवार म्हणाले : “मी ५० वर्षांपासून राजकारणात काम करतोय. ही संधी महाराष्ट्रातल्या जनतेनं दिली म्हणून इथपर्यंत येता आलं,” असं म्हणत त्यांनी आभार मानले. कार्यकर्त्यांना फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांची पिढी घडवण्याचे आवाहन केले.
मुंबईतील वाय.बी. चव्हाण सभागृहात शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
पवार म्हणाले, “माणसाला वय मिळतं. वाढतं जातं. जी विचारधारा आपण स्वीकारली, जे सूत्र स्वीकारलं त्या मार्गानं जाण्याचं काम करायचं असतं.
स्वातंत्र्यपूर्व काळात गांधी-नेहरू विचारांची पताका घेऊन काम केलं पाहिजे हे त्या मातेनं स्वीकारलं आणि कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली. तिचा दृष्टिकोण आम्हाला महत्त्वाचा ठरला.
अनेकांनी फुले-आंबेडकरांचा उल्लेख केला. सगळ्यांनी आपल्या नेतृत्वातून दृष्टी दिली.
आज त्यांच्या नावाचा उल्लेख करून चालणार नाही. त्यांनी दिलेल्या दृष्टीतून समाज मानसिकता तयार करण्याची जबाबदारी घ्यावी लागले,” असे आवाहन शरद पवार यांनी केले.

