वादग्रस्त ठरलेल्या एल्गार परिषदेला अखेर राज्य सरकारने परवानगी दिली आहे. एल्गार परिषद पुन्हा होणार असल्यामुळे पुण्यात वाद पेटला आहे.
राज्य सरकारने एल्गार परिषदेला परवानगी दिल्यामुळे पुण्यातील ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेतला आहे.
भीमा कोरेगाव शौर्यदिना निमित्ताने १ जानेवारी रोजी एल्गार परिषद घेण्याचे ठरले होते. परंतु, राज्य सरकारने या परिषदेला परवानगी नाकारली होती.
त्यानंतर एल्गार परिषदेचे आयोजक आणि माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे-पाटील यांनी पुण्यात एल्गार परिषद घेण्यावर ठाम भूमिका मांडली होती.
त्यांनी राज्य सरकारकडे पुन्हा यासाठी रितसर परवानगी मागितली. अखेर अटी-शर्थींसह या परिषदेला परवानगी देण्यात आली आहे.
त्यामुळे ३० जानेवारीला पुण्यात एल्गार परिषदेचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या ३० जानेवारीला पुण्यातील गणेश कला क्रीडा सभागृहात एल्गार परिषद घेण्यात येणार आहे.

