इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या पुतळ्याची आज पायाभरणी होणार होती.
मात्र, निमंत्रणाच्या वादावरून हा कार्यक्रम आज रद्द करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमंत्रणावरुन नाराजी नाट्य सुरू होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फक्त 16 जणांनाच निमंत्रण देण्यात आले होते. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू आनंदराज आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण नसल्याने ते नाराज असल्याचे सांगत होते.
तसेच आंबेडकरी चळवळीतील कोणालाही आमंत्रित करण्यात न आल्यानं नाराजी व्यक्त केली जात होती. त्यामुळे आज होणारा हा सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.
सर्व विभागांशी समन्वय साधून या कार्यक्रमाची पुढील तारीख ठरवण्यात येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार लवकरच कार्यक्रम घोषित करु. अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

