Pune City News:- राज्यातल्या ‘कोरोना विषाणू’ रुग्णसंख्येत झालेली वाढ वैयक्तिक संपर्कातून झालीय. समूह संसर्गाची लक्षणं अद्याप आढळलेली नाहीत. योग्य काळजी घेतल्यास ‘कोरोना’संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात जाण्यापासून आपण राज्याला आजही वाचवू शकतो. त्यासाठी जनतेनं घराबाहेर न पडण्याचा दृढनिश्चय करावा,असं आवाहन करतो. आज, राज्यात ७ नवे रुग्ण आढळल्यानं एकूण रुग्ण संख्या १९३ झाली आहे. सांगली जिल्ह्याच्या इस्लामपूरमध्ये एकाच कुटुंबातले २४ जण आणि अमरावती जिल्ह्यातल्या व्यापाऱ्यासह कुटुंबातील ५ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. इतरांचा जीव धोक्यात घालून बेजबाबदारपणे वागणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील. राज्यातली कोरोना रुग्ण संख्या मर्यादित ठेवायची असेल तर, प्रत्येकानं ‘लॉकडाऊन’चं पालन करून घरीच थांबावं. कुठेही गर्दी करू नये. परराज्यातील मजूरांनी आपापल्या राज्यात जाण्याचा प्रयत्न करून जीव धोक्यात घालू नये. त्यांच्या निवास, भोजनाची व्यवस्था संबंधित जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येईल. राज्यातली शासकीय यंत्रणा ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यासाठी सज्ज आहे. ‘कोरोना’ग्रस्तांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. त्या दृष्टिकोनातून हजार शासकीय व खाजगी रुग्णालयांत ‘महात्मा फुले जन आरोग्य योजनें’तर्गत हे उपचार केले जाणार आहेत. डॉक्टर, आरोग्य, पोलीस, महसूल, बँक कर्मचारी तसंच विविध शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मी पुन्हा-पुन्हा आभार मानतो! देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी जी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमातून केलेल्या आवाहनाचं जनतेनं पालन करावं. राज्य सरकार, केंद्र सरकार व आपण सारे देशवासी मिळून ‘कोरोना’विरुद्धचा लढा जिंकू!
(Ajit pawar Facebook wall)

