पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच पीओकेवर भारत आता अधिक स्पष्टपणे भूमिका घेत आहे. भारताने पीओकेमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला, नंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये आपले सैन्य घुसवून दहशतवाद्याची ठिकाणे उद्ध्वस्त केली.
आता हवामान विभागाने गिलगिट आणि मुझफ्फराबादच्या हवामानाची माहिती देणे सुरू केले आहे. या सर्व बाबींच्या आधारे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज महत्त्वाचे विधान केले आहे.
वक्तव्य : जरा प्रतीक्षा करा, पाकव्याप्त काश्मीरमधून काही दिवसांतच भारतात सामील होण्याची मागणी होऊ लागेल असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
संरक्षणमंत्री म्हणाले: भाजपच्या जम्मू जनसंवादादरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बोलत होते. पीओकेविषयी ते म्हणाले, ‘काही दिवस थांबा, पीओकेकडून अशी मागणी होईल की आम्हाला पाकिस्तानच्या ताब्यात न राहता भारतासोबत रहायचे आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या दिवशी हे घडेल त्याच दिवशी आमच्या संसदेचा संकल्प देखील पूर्ण होईल.’
पाकिस्तानच्या खोड्या : आता ऋतू बदलला आहे आणि आमच्या वाहिन्या मुझफ्फराबाद-गिलगिटचे तापमान, हवामानाची माहिती देत आहेत. असे होऊ लागल्याने आता इस्लामाबादमध्येही हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तानचा आता अधिक खोड्या करण्याचा प्रयत्न दिसतो आहे.
जवान शहीद: अलिकडच्या काळात पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन वाढत आहे. गत 4 दिवसांमध्येही पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून दरम्यान केलेल्या गोळीबारात भारताचे दोन जवान शहीद झाले आहेत.

