PUNE CITY NEWS :- समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आपले जीवन पणाला लावणारे तसेच पुरोगामी विचार सरणीला चालना देणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज सात वर्षे पूर्ण झाली. त्याबाबद्दल त्यांची जय ठिकाणी हत्या झाली त्या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
सात वर्षे उलटूनही डॉ. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यात सीबीआय या तपास यंत्रणेला अद्यापही यश आलेले नाही. ही अत्यंत खेदजनक बाब आहे. मात्र, आजही त्यांचे विचार आणि त्यांना न्याय मिळण्याची आशा जिवंत आहे, अशी भावना मुक्ता आणि डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केली.
पुण्यातील बालगंधर्व पूल येथे दि. २० ऑगस्ट २०१३ रोजी त्यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतरचे पहिले नऊ महिने महाराष्ट्र पोलिसांनी तपासात अक्षम्य हेळसांड केली. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयकडे तपास सोपविण्यात आला.
या हत्येतील संशयित आरोपी म्हणून सीबीआयने २०१६ मध्ये डॉ. विरेंद्र तावडे, ऑगस्ट २०१८ मध्ये शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना तर २०१९ मध्ये ऍड. संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांना अटक करून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केले आहे.
तसेच अद्यापही अमोल काळे, अमित डिगवेकर, राजेश बंगेरा या संशयित आरोपींविरूद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. असे असले तरी अद्यापही या हत्येमागील सूत्रधार कोण? हे स्पष्ट झाले नसल्याचे हमीद दाभोलकर यांनी सांगितले.

