केंद्रातील भाजप सरकार विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. अण्णांच्या या इशाऱ्यानंतर भाजपच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे.
दिल्लीच्या सीमेवर गेल्या 58 दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे यांनी आंदोलन पुकारले तर केंद्र सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
त्यामुळे आता राज्यातील भाजप नेत्यांकडून अण्णांची मनधरणी करण्याचे काम सुरु आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज अण्णा हजारे यांची भेट घेतली.
फडणवीस यांच्यापूर्वी विखे पाटील आणि अण्णा हजारे यांच्यात तासभर चर्चा झाली. त्यानंतर फडणवीस, विखे-पाटील आणि अण्णांमध्ये पुन्हा एकदा दीड तास बंद दाराआड चर्चा झाली.
या बैठकीनंतरही आपण आंदोलनावर ठाम असल्याचे अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले आहे. केंद्रीय कृषीमंत्री यांनी दिलेले पत्र देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला दिले. त्यावर चर्चा झाली पण तोडगा निघाला नाही, असे अण्णा हजारे यांनी सांगितले आहे.

