एका वृत्त वाहिनीचे पत्रकार अर्बन गोस्वामी यांच्याविरोधात हेतुपूर्वक अफवा पसरविणे, चिथावणीखोर वक्तव्य करणे, याबाबत पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( शहर) अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे यांच्या मार्फत ऍड.तौसीफ शेख यांनी तक्रार दिली आहे.
या तक्रारीत म्हटले आहे की, गोस्वामी यांनी पत्रकारीतेचा गैरवापर करत अनेक अफवा पसरवण्याचे काम करत आहेत. तसेच त्यांच्याकडून भडकाऊ वक्तव्ये केली जात आहेत.
सुशांत सिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला असताना प्रकरणातील साक्षीदारांना फोन करून त्यांची उलट तपासणी घेत आहे. हे कायद्याविरूध्द असल्याचे सांगत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
देशांतर्गत शांतता आणि शांतता भंग करण्याच्या हेतूने, आणि सामाजिक अशांतता निर्माण करणे, तसेच येणाऱ्या काळात त्यांच्या बोलण्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात दंगली निर्माण होऊ शकतात अशी शक्यताही तक्रारीमध्ये नमूद करण्यात आली आहे. यावरून पुण्यातील खडक पोलिसात त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

