Pune City News:- देशावरील कोरोना विषाणू च्या संकटाला थोपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारपासून देशभरामध्ये २१ दिवसांचा लॉकडाऊन लागू केला. या काळामध्ये अत्यावश्यक सुविधा वगळता अख्खा देश बंद राहणार आहे. कोरोना विषाणू या संसर्गजन्य आजाराला रोखण्यासाठी लॉकडाऊन गरजेचा असला तरी यामुळं हातावर पोट असलेल्या मजुरांना हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. देशभरातील सर्व कामकाज सध्या ठप्प असल्यानं या मजुरांच्या हातचं काम हरपलं असून यामुळं त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या मजुरांच्या व्यथा काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मांडल्या आहेत. याबाबत त्यांनी ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे, देशाच्या जनतेने बहाल केलेल्या अधिकाराचा वापर करून या मजुरांचे प्राण वाचवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
● आपल्या ट्विटमध्ये त्या लिहतात, “एक देश म्हणून आपण या मजुरांना कोणत्या भरवशावर एकटं सोडू शकतो? आपल्या राज्याकडे पायपीट करत निघालेल्या या जथ्यांमध्ये स्त्रिया अन् पुरुषांचाच नव्हे तर बालकांचा देखील समावेश आहे. आपण आपल्या युरोपातील नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी विमानं पाठवू शकतो तर या गरिबांसाठी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देऊ शकत नाही का? पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी लोकांनी बहाल केलेल्या अधिकाराचा आतातरी वापर करावा.”


