Pune City News:- देशात लागू असलेल्या (लॉकडाऊन)टाळेबंदी च्या काळातही सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सतत पाठपुरावा करून ऊसतोड मजुरांना त्यांच्या घरी परतण्याची परवानगी मिळवून दिली.यानुसार राज्यात विविध जिल्ह्यात अडकलेल्या ऊसतोड मजुरांपैकी जवळपास 90 टक्के मजूर आपापल्या गावी परतण्यासाठी मार्गस्थ झाले आहेत.
बीड जिल्ह्यातील 18 हजार मजूर आपापल्या गावी पोचले आहेत. उर्वरित सर्व ऊसतोड मजूर दोन दिवसात आपापल्या गावी पोचतील, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. राज्यात विभागनिहाय पश्चिम महाराष्ट्र 1 लाख 24 हजार, नागपूर विभाग 5 हजार, तर मराठवाड्यात जवळपास दोन हजार असे एकूण 1 लाख 31 हजार ऊसतोड मजूर गावी, तर काहीजण परतीच्या प्रवासात अडकलेले होते.त्यापैकी आतापर्यंत 18 हजार 067 मजूर गावी परतले आहेत. त्यांना धान्यासह विविध सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत.

