राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र आहे.
● या पार्श्वभूमीवर आज झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊन सारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत, अशा सूचना देण्यात आल्या.
● यासंदर्भात आज आयोजित बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्स डॉक्टर्स यांनी चर्चा केली.
● कोरोनाचे निर्बंध आणि नियमांचे कडक पालन होणार नसेल, तर येत्या काही दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन लावून संसर्ग थोपवावा, अशी या बैठकीत चर्चा झाली.
● यावेळी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अभ्यागतांना पूर्ण प्रवेशबंदी घालण्याच्या सूचना दिल्या आहेत.
● तसेच खासगी कार्यालये 50 टक्के कर्मचारी संख्येचे निर्बंध पाळत नसतील तर लॉकडाऊनची तयारी करावी, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
लॉकडाऊन बाबत काय म्हणाले मुख्यमंत्री ?
● एकीकडे आपण कोविड परिस्थितीतही अर्थव्यवस्था सुरु राहील, याचा प्रयत्न करतोय. मात्र अनेक घटक अजूनही ही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत.
● खासगी कार्यालयातून उपस्थिती नियमांचे पालन होत नाही, विवाह समारंभ नियम तोडून सुरु आहेत, तसेच बाजारपेठांमध्ये सुरक्षित अंतर, मास्कचे पालन होताना दिसत नाही.
● शेवटी लोकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे याला प्राधान्य आहे. त्यामुळे अतिशय कठोरपणे नियमांचे पालन करावे, अन्यथा लॉकडाऊन करावं लागेल, असे समजून धान्य पुरवठा, औषधी, अत्यावश्यक सेवा, यांचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी मुख्य सचिवांना दिले
बैठकीतील निर्णय :
● मर्यादित दिवसांसाठी लॉकडाऊन लावावे, त्याची कार्यपद्धती मदत व पुनर्वसन प्रधान सचिव यांनी तयार करावी.
● जेणे करून नियोजनबद्ध रीतीने लॉकडाऊनची अंमलबजावणी करता येईल.
● ऑक्सिजनची महत्वाची भूमिका असल्याने तो पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहावा.
● गृह विलगीकरण करण्यापेक्षा संस्थात्मक विलगीकरणकरण्यावर भर द्यावा.
● मृत्यू पुढे जाऊन वाढू शकतील, त्यामुळे ई आयसीयू, व्हेंटीलेटर्स पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावे.
● प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ मिळण्यासाठी खासगी डॉक्टर्सची सेवा घ्यावी.
● विशेषत: वृद्ध व सहव्याधी रुग्णांना प्राधान्याने उपचार मिळावेत.
● सहव्याधी असलेल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम पद्धतीतून काम करू द्यावे.

