Pune City News:- परदेशातून परतलेल्या व्यक्तींना शासनाच्या विलगीकरण कक्षात राहणे अनिवार्य करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री श्री. राजेशजी टोपे यांनी आपल्या पुणे महापालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाला भेट दिली. यावेळी महापालिकेच्या पातळीवर घेण्यात येणाऱ्या दक्षता, दिल्या जाणाऱ्या सेवा आणि केलेली तयारी, या संदर्भात आरोग्यमंत्र्यांना सविस्तर माहिती दिली.
तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परदेशातून परतलेल्या व्यक्तींना विलगीकरण कक्षात राहणे अनिवार्य करा, ही मागणी आज राज्य सरकारकडे केली आहे. यामागणीचे पत्रही यावेळी टोपे यांना दिले. तसेच यासंदर्भात मा. मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनाही पत्र पाठविलेले आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून त्यातील बहुतांश रुग्णांना ते परदेशातून भारतात आल्याची पार्श्वभूमी आहे. आपण परदेशातून परतणाऱ्या नागरिकांना त्यांच्याच घरात विलगीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु मुंबई आणि पुणे विमानतळावर येणारे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाणारे हे नागरिक स्थानिकांच्या संपर्कात येत आहेत. पुण्यातील घटनांमध्ये हे प्रकर्षाने जाणवले असून, त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे घरी विलगीकरण करण्याऐवजी विलगीकरण कक्षात राहणे अनिवार्य करावे.
परदेशातून परतलेले नागरिक कोरोनाबाधित असतील तर जाताना ते कॅब चालक, त्यांचे नातेवाईक आणि इतर स्थानिकांच्या संपर्कात येत असून त्यामुळे कोरोनाचा फैलाव वाढण्याचा धोका आहे. शिवाय घरात विलगीकरण कक्षात राहण्याचे आदेश दिले असले, तरी नागरिकांकडून त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे परदेशातून येणाऱ्या नागरिकांना मुंबई व पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळच्या उपलब्ध इमारतीत क्वारंटाईन करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला सूचना देऊन बंधनकारक केल्यास इतर नागरिकांना याचा प्रादुर्भाव होण्याचा धोका कमी होण्यास मदत होईल आणि मुंबई व पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळपास याची सोय उपलब्ध झाल्यास कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक प्रभावीपणे रोखता येईल.



