राज्याचे सध्याचे मुख्य सचिव अजोय मेहता हे 30 जूनला सेवानिवृत्त होत असून 1 जुलैपासून ते मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. यासाठी त्यांना मुख्यमंत्री सचिवालयात 603 क्रमांकाचे दालन व मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे आज सांगितले.
निर्णय : कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक, प्रशासकीय यंत्रणा परत वेगाने सुरू करण्यासाठी व्यापक आणि दीर्घ अनुभव असणाऱ्या व्यक्तीची मुख्यमंत्री सचिवालयात नितांत आवश्यकता असल्याने अजोय मेहता यांना निवृत्तीनंतर प्रधान सल्लागार हे पद देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.
कामाचे स्वरूप : 1984 च्या बॅचचे आयएएस अधिकारी अजोय मेहता यांनी प्रशासनात विविध महत्त्वाची पदे भूषविली आहेत. आता ते प्रामुख्याने कोविडच्या पार्श्वभूमीवर आर्थिक व प्रशासकीय यंत्रणा वेगाने कार्यान्वित करण्याची तसेच नव्या औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्याची जबाबदारी पार पाडतील, असे त्यांचे कामाचे स्वरूपही स्पष्ट केले आहे.
चर्चेला पूर्णविराम : अजोय मेहता यांना मुदतवाढ देण्यास मुख्यमंत्री अनुकूल तर काँग्रेस व राष्ट्रवादीचा मेहता यांच्या मुदतवाढीस विरोध असल्याचे सांगण्यात येत होते. या सर्व चर्चेला आज पूर्णविराम मिळाला आहे.

