PUNE CITY NEWS :- पुणे जिल्ह्यातील गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील राजगुरुनगर व मंचर बायपास रस्त्यांची कामे मार्गी लागली आहेत. या कामांची निविदा नुकतीच उघडण्यात आली आहे.
तांत्रिक बाबींची पूर्तता होताच या दोन्ही बायपासचे काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अशी माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली आहे.
पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चांडोली ते आळेफाटा (पुणे जिल्हा हद्द) या टप्प्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले होते. त्यामुळे नेहमी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त होते. स्वत: पुढाकार घेऊन बायपासला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे.
नारायणगाव आणि खेडघाट येथील बायपास रस्त्यांची कामे मार्गी लावण्यासाठी त्यातील अडचणी दूर केल्या. येत्या काही काळात हे दोन्ही बायपास रस्ते वाहतुकीसाठी खुले होणार आहेत. त्याचबरोबर कळंब आणि आळेफाटा बायपास प्रक्रिया अंतिम टप्यात असून ३० जुलै २०२० ही निविदा भरण्याची अंतिम मुदत आहे.
लॉकडाऊनमुळे मोशी ते चांडोली टप्याचे सहापदरी करणासाठीचे भुसंपादन होऊ शकले नाही. मात्र कोरोनाची परिस्थिती निवळतात, नाशिक फाटा ते मोशी आणि मोशी ते चांडोली या दोन्ही टप्प्यातील भूसंपादनातील अडचणी दूर करून हे काम मार्गी लावण्याला प्राधान्य देणार असल्याचे कोल्हे यांनी यावेळी सांगितले आहे.

