PUNE CITY NEWS:- पुण्यासाठी भामा आसखेड जलवाहिनीचे सुरू असलेले काम बंद करा, असे म्हणत भामा आसखेडग्रस्तांनी भर पावसात बुधवार( दि.१९) पासून आंदोलन सुरू केले आहे. शासकीय अधिकारी आंदोलन स्थळी न आल्याने आंदोलनग्रस्तांनी २३ गावांनी या जलसमाधी आंदोलनात सहभाग घेतला आहे.
शासकीय अधिकारी आंदोलन स्थळी आले नाही तर २३ गावांत जलसमाधी आंदोलन सुरू करू, असा इशारा आंदोलकांनी दिला होता. त्यानुसार अधिकारी न फिरकल्याने २३ गावांत जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे.
तरीही आंदोलक जलवाहिनीच्या ठिकाणी उपोषण करण्याच्या तयारीत होते. मात्र चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांनी करंजविहीरे जवळच आंदोलकांना अडवले. त्यांना उपोषणापासून परावृत्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रयत्न केला. मात्र शेतकरी आंदोलनावर ठाम होते.
उपोषण करू दिले नाही किंवा अटक केली तर लगेचच २३ गावांमध्ये जलसमाधी आंदोलनाला सुरुवात करू असा इशारा आंदोलकांनी दिल्याने काही अटींवर पोलीस प्रशासनाने जलवाहिनीपासून २ ते ३ किलोमीटर अंतरावर निवडक लोकांना उपोषणाची परवानगी दिली.
या आंदोलनात सत्यवान नवले, देवदास बांदल, गजानन कुडेकर, नवनाथ शिवेकर, अण्णा देवाडे, संतोष कावडे, किसन नवले, मंदार डांगले, कैलास साबळे, नामदेव देशमुख उपोषणास बसले आहेत. बाकी सर्व प्रकल्पग्रस्तांना पोलिसांकडून माघारी पाठवण्यात आले आहे.

