PUNE CITY NEWS :- कोरोना संकटाच्या सावटाखाली सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून राज्यभरात बाप्पांचे आगमन होत आहे. अनेक घरांमध्ये तर कालपासूनच बाप्पाचे आगमन झाले आहे. तर काही ठिकाणी आज पहाटेपासून बाप्पाचे आगमन होत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर कोरोना संकटामुळे यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले : कोरोनामुळे जिथं संपूर्ण जग हादरुन गेलं आहे तिथं याविरुद्ध एक मोठा लढा लढण्याची संधी आपल्याला मिळाली आहे.
एक नवे समाज प्रबोधन आपण करु आणि सामाजिक भान ठेवून शांततेत यंदाचा गणेशोत्सव साजरा करु, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
आवाहन : संपूर्ण उत्सव काळात गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी. गाफील न राहता आतापर्यंत आपण जी काळजी घेतो आहोत, तीच पुढेही घ्यावी, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

