पुणे : कोरेगाव भिमा येथे होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन दिनाच्या अनुषंगाने होणाऱ्या विविध नियोजनाचा आढावा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला. अभिवादनासाठी येणाऱ्या लाखो अनुयायांसाठी आवश्यक सुविधा, सुरक्षा आणि व्यवस्थापन याबाबत त्यांनी संबंधित विभागांना सूचनाही दिल्या.
बैठकीस बार्टीचे महासंचालक सुनील वारे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, पोलीस सहआयुक्त सोमय मुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस विभाग, पीएमपीएल, आरोग्य विभाग, पंचायत राज संस्था आणि अग्निशमन दलाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डुडी यांनी विजयस्तंभ परिसरातील दुरुस्ती, फुलांची सजावट, प्रकाशयोजना, स्वच्छता आणि सुरक्षा उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले. वाढत्या गर्दी आणि वाहतुकीचा विचार करून मोठ्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग झोन, छोटे वाहन व दुचाकींसाठी स्वतंत्र जागा, तसेच तात्पुरता पार्किंग विस्तार करण्यावर त्यांनी भर दिला.
यासोबतच प्रवेश–निर्गमन मार्गांची स्वतंत्र आखणी, वाहतूक वळविण्यासाठी दिशादर्शक फलक, आणि कोंडी टाळण्यासाठी वाहतूक नियंत्रण उपाययोजना राबविण्याचे निर्देशही देण्यात आले.
अनुयायांसाठी सुविधा — पाणी, सावली, स्वच्छता आणि विश्रांती पायी येणाऱ्या अनुयायांना सुरक्षित पथ, सावली, पाणी पिण्याची ठिकाणे आणि विश्रांती सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश ग्रामपंचायतीला देण्यात आले.
महिलांसाठी स्वतंत्र मार्ग, हिरकणी कक्ष, आणि पुरेशा स्वच्छता सुविधा उभारण्याचे निर्देशही दिले.
कार्यक्रमादरम्यान लाखोंची गर्दी अपेक्षित असल्याने, शौचालयांची संख्या वाढवणे, मोबाइल टॉयलेट युनिट्स कार्यरत ठेवणे, स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, कचरा संकलनासाठी विशेष पथके, डम्पर, कंटेनर आणि नियमित संकलन व्यवस्था ठेवणे यावरही भर देण्यात आला.
आरोग्य व आपत्कालीन सेवा प्राथमिक उपचार केंद्र, डॉक्टर व नर्सिंग स्टाफ, आवश्यक औषधे, रुग्णवाहिका आणि आपत्कालीन पथके सदैव सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले.
जिल्हाधिकारी डुडी यांनी संपूर्ण परिसरात विस्तृत पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले.
यामध्ये राज्य राखीव पोलीस दल,संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, २४x७ नियंत्रण कक्ष, वायरलेस यंत्रणा,अग्निशमन दल,ड्रोनद्वारे देखरेख यांचा समावेश आहे.
बार्टीतर्फे माहिती केंद्र, मार्गदर्शनासाठी स्वयंसेवक, बुक स्टॉल यांची व्यवस्था करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
विजयस्तंभ अभिवादन दिवस हा ऐतिहासिक आणि राष्ट्रीय महत्त्वाचा कार्यक्रम असल्याचे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागांना गतीने व परस्पर समन्वयाने काम करून अनु
यायांना सुरक्षित, सुरळीत आणि सन्माननीय वातावरण उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.

