पुणे शहर :- कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भाव मुळे संपूर्ण राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण राज्यभरातील आंतरजिल्हा वाहतुकीवर बंदी घातली आहे. फक्त अत्यावश्यक काम असल्यास तसेच वैद्यकीय काम असल्यासच ई-पास काढून नागरिकांना प्रवास करता येणार असल्याचं स्पष्ट केलं.
पुणे पोलिसांकडे आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी मागच्या 17 दिवसांमध्ये तब्बल 1 लाख 5 हजार 744 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले. पण विशेष म्हणजे, प्रवास करण्यासाठी शुल्लक कारण सांगून ई-पास मिळवण्यासाठी नागरिक अर्ज करत असल्याचं स्पष्ट झालं.
लाखात असणाऱ्या या ई-पास अर्जांपैकी फक्त 27 हजार 592 अर्ज पुणे पोलिसांकडून मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एकूण अर्जापैकी फक्त 30 टक्के अर्ज पोलिसांकडून मंजूर करण्यात आले असून 70 टक्के अर्ज हे खोटी कारणं तसेच शुल्लक कारणं देऊन करण्यात आल्याने त्यांना फेटाळण्यात आले आहे.
लॉकडाऊनमध्ये लोकांना आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी फक्त कोणी मयत झालं असेल, लग्न समारंभ असेल किंवा वैद्यकीय कारणासाठी प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे पण नागरिक इतरत्र फिरण्यासाठी तसेच नातेवाईकांच्या घरी भेट देण्यासाठी ई-पाससाठी अर्ज करत असल्याने पोलिसांकडून पडताळणी करून ते अर्ज फेटाळण्यात येत आहेत.

