खेळ हा सर्वसामान्यांच्या जीवनशैलीचा भाग व्हायला हवा, असे प्रतिपादन केंद्रीय क्रीडा कार्यक्रम आणि युवा मंत्रालयाचे राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी केले.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्राचे लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, राज्यमंत्री आदिती तटकरे, पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, खासदार गिरीश बापट, क्रीडा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांची प्रमुख उपस्थिती होती.
राज्यमंत्री किरेन रिजीजू म्हणाले, देशात क्रीडा संस्कृती पुरातन कालापासून आहे. तिची जोपासना होण्याची गरज आहे. खेळ हा आपल्या जीवनशैलीचा भाग झाला पाहिजे.
देशात आणि राज्यातही क्रिडा क्षेत्राची वाढ होण्यासाठी केंद्र शासनाच्यावतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. महाराष्ट्राला क्रीडा क्षेत्रासाठी केंद्र शासन सर्वतोपरी मदत करेल,असेही त्यांनी सांगितले.
राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार म्हणाले, राज्य शासन विद्यार्थ्यांमध्ये खेळांची आवड निर्माण व्हावी, म्हणून व्यापक प्रयत्न करत आहे. खेळ आणि खेळाडू यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे आहे. केंद्र शासनाने क्रीडा क्षेत्रासाठी भरीव मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी राज्य शासन क्रीडा क्षेत्रात राबवत असलेल्या योजनांची माहिती दिली. पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलाने क्रीडा क्षेत्राच्या इतिहासात प्रभावशाली भूमिका बजावलेली आहे.

