आपण लोकशाहीचे कैवारी कमी आणि मारेकरी जास्त आहोत. त्यामुळे भारतीय लोकशाहीत बंधुतेचा धागा तुटला आहे. या बंधुतेच्या धाग्याची वीण घट्ट करून पुन्हा लोकशाहीला बळ देण्याचे काम बंधुता चळवळ करत आहे.
हा धागा जाती-धर्माच्या भिंती ओलांडून बहुसांस्कृतिक एकता निर्माण करणारा आहे,” असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि काषाय प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘बंधुता आणि संघर्ष’ ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात डॉ. सबनीस बोलत होते.
डेक्कन जिमखाना येथील हॉटेल सुकांता येथे झालेल्या या प्रकाशन सोहळ्याला सौ. ललिता सबनीस, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अशोककुमार पगारिया, बंधुताचार्य प्रकाश रोकडे, मंदाकिनी रोकडे उपस्थित होते.
यावेळी विविध क्षेत्रातील १९ व्यक्तींना आणि सहा संस्थांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथमित्र पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. डॉ. सबनीस व वानखेडे यांनी रोकडे यांचा सपत्नीक सत्कार केला.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “सर्व जाती-धर्माना बांधणारे हे बंधुतेचे व्यासपीठ आहे. प्रकाश रोकडे यांनी माणसे जोडण्याचे काम केले. वेगवेगळ्या जातीप्रवाहतील दिगग्ज, विद्वान एकत्र आणले. करुणेचा भावनेतून जातीअंताचा लढा करावा, माणसाच्या मनातील जातीची जळमटे काढून टाकावीत, यासाठी हा विचार महत्वाचा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

