Pune City News :- पुणे कृषी उत्पन्न बाजार आवारातील कामगारांना माथाडी मंडळाकडून प्रत्येकी १० हजार रुपयांची उचल देण्यात सुरुवात करण्यात आली आहे. कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आदेशानंतर हे वाटप करण्यात येत आहे. या निर्णयाचे कामगार संघटनांकडून स्वागत करण्यात येत असून आठ हजार कामगारांना याचा लाभ मिळणार आहे.
गेल्या ५० दिवसांपासून पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील भाजीपाला मार्केट बंद आहे. त्यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. कुठूनही मदत मिळत नव्हती.
त्यामुळे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे मदत मागितल्यावर त्यांनी माथाडी मंडळामार्फत उचल देण्यास सांगितले, अशी माहिती कामगार संघटनेचे संताेष नांगरे यांनी दिली. माथाडी मंडळ, कामगारमंत्री व डॉ. बाबा आढाव यांच्या प्रयत्नामुळेच हा आधार मिळाला असल्याच्या भावना कामगारांनी यावेळी व्यक्त केल्या आहेत.

