Pune City News :- देशात व राज्यात कोरोना विषाणू मुळे सर्वच कार्यक्रम रद्द केले आहेत. निवडणूक आयोगाने विधान परिषदेची निवडणुकही पुढे ढकलली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागते की, काय अशी चर्चा सुरू होती. त्यावर आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत तोडगा निघाला.
उद्धव ठाकरे यांना राज्यपालांच्या कोट्यातून विधान परिषदेत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी संदर्भात राज्यपालांकडे शिफारस केली जाणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता निवडणूक आयोगाने राज्यातील विधान परिषदेची निवडणूक लांबणीवर टाकली. याचा फटका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बसू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.
घटनेतील 164 (4) कलमानुसार, विधिमंडळाचा सदस्य नसल्यास सहा महिन्यांत सदस्य होणे बंधनकारक असते. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 27 मेपूर्वी सदस्य होणे आवश्यक आहे.
विधान परिषद निवडणूक लांबणीवर पडली असली, तरी उद्धव ठाकरे यांचा विधिमंडळात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या कोट्यातून उद्धव ठाकरे यांना विधिमंडळाचं सदस्यत्व देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात लवकरच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे शिफारस केली जाणार आहे.
previous post

