Pune City News :- कोरोना विषाणू’च्या संसर्ग प्रतिबंधासाठी लागू केलेल्या राज्य प्रवेशबंदी, जिल्हा प्रवेशबंदी आणि संचारबंदीसारख्या निर्णयांची अंमलबजावणी राज्यात कठोरपणे करण्यात येईल, त्यासाठी पोलिसांना कारवाईचे संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
भाजीपाला, फळे, दूध, अन्नधान्य आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कायमस्वरुपी सुरळीत ठेवण्यात येणार असल्याने नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करु नये. राज्यशासनाचा आरोग्य विभाग, पोलिस विभाग, महापालिका प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी सर्वजण जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य पार पाडत आहेत. जनतेनेही संयम पाळून शासनाच्या प्रयत्नांना साथ द्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.
आवाहनातील मुद्दे:
▪ जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवणं ही सरकारची जबाबदारी.
▪ कृषी उत्पन्न बाजार समितीतील आवक सुरळीत ठेवणार.
▪ मास्क, सॅनिटायझर, औषधे, जीवनावश्यक वस्तूंचा अवैध साठा, काळाबाजार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार.
▪ राज्यप्रवेशबंदी, जिल्हा प्रवेशबंदी, संचारबंदीची कठोर अंमलबजावणी.
▪ पोलिसांना अंमलबजावणीसाठी संपूर्ण स्वातंत्र्य, खरेदीसाठी बाजारात गर्दी करु नये.

