PUNE CITY NEWS :- शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना बँकांकडून पीक कर्जाचे वाटप वेळेत होण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी केली.
विभागीय आयुक्त कार्यालयात खरीप २०२०-२१ या वर्षातील खरीप हंगाम कर्ज वाटप व मान्सून कालावधीत धरणामधील पाण्याचे नियोजन व खबरदारीच्या उपाययोजना याबाबत विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे आढावा बैठक घेण्यात आली.
बैठकीला विभागीय सहनिबंधक संगिता डोंगरे, जलसंपदाचे मुख्य अभियंता विलास राजपूत, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, प्रताप जाधव, नैना बोंदार्डे, साधना सावरकर, त्रिगुन कुलकर्णी, जयंत पिंपळगावकर, पी.बी.पाटील तसेच संबंधित बँकांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी डॉ. म्हैसेकर म्हणाले, जिल्हयांमध्ये महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना २०१९ योजनेतील पात्र खातेदारांच्या यादीतील खाती निरंक झालेल्या व न झालेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगामामध्ये पीक कर्ज देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर या पाचही जिल्हयांतील जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँका, राष्ट्रीयकृत बँका तसेच खाजगी व ग्रामीण भागातील बँकांनी पीक वेळेत पीक कर्जाचे वाटप करावे.
तसेच सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी कमी प्रमाणात कर्ज वाटप असलेल्या बँकांचा विशेष आढावा घेवून इष्टांक पूर्ण करावा. शेतकरी बांधवांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी संबंधित विभागांनीही दक्ष राहावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

